Jump to content

वसंत पाटणकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डाॅ. वसंत सीताराम पाटणकर यांचा जन्म २० जानेवारी १९५१ रोजी झाला. मराठीत स्वतः कवी असून कवितेचे समीक्षक असलेले जवळजवळ नाहीतच. पण एकोणीसच्या सत्तरच्या दशकात स्वतः आधुनिक जाणिवेचे कवी म्हणून नावारूपाला आलेले पाटणकर एकीकडे कविता लिहीत असतानाच, दुसरीकडे कवितेच्या समीक्षेशीही जोडलेले राहिले. एवढेच नाही, तर प्रसंगी त्यांनी कविता लिहायची थांबवली, पण कवितेसंबंधीचा त्यांचा विचार मात्र सुरूच राहिला. त्यामुळेच आजवर ‘विजनातील कविता’ हा एकच कवितासंग्रह त्यांच्या नावावर जमा आहे. 

अध्यापकीय कारकीर्द[संपादन]

वसंत पाटणकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात अध्यापनाचे कार्य केले.

ग्रंथसंपदा[संपादन]

  • अरुण कोलटकरांची कविता
  • कविता : संकल्पना, निर्मिती आणि समीक्षा
  • कवितेचा शोध
  • ग्रेस यांची कविता : काही निरीक्षणे, अनेक प्रश्न
  • द.ग.गोडसे यांची कलामीमांसा
  • विजनांतील कविता
  • साहित्यशास्त्र : स्वरूप आणि समस्या
  • स्वातंत्र्योत्तर मराठी कविता १९४५-६०

पुरस्कार[संपादन]

१. 'यशवंत दाते स्मृती संस्थे’तर्फे देण्यात येणारा ‘डॉ. भा.ल. भोळे’ पुरस्कार‘कवितेचा शोध’ या समीक्षात्मक पुस्तकाला देण्यात आला.

पुरस्कार वापसी[संपादन]

भारतात व महाराष्ट्र राज्यात वर्षभरात धर्माच्या नावाखाली विचारवंतांना व लेखकांना खुलेआम गोळया घालून ठार केले जात असताना सरकार मौन बाळगून होते. राज्यघटनेच्या पायाभूत मूल्यांवरच चौफेर बाजूने घाला घातला जात होता. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या राज्यातील नऊ नामवंत साहित्यिकांनी पुरस्काराचे मानचिन्ह आणि रक्कम मुख्यमंत्र्यांच्या खाजगी सचिवांकडे सोपवली. या साहित्यिकांत वसंत पाटणकर होते. (सन २०१५).

काव्यविशेष[संपादन]

वसंत पाटणकरांनी कवितेची एकसत्त्ववादी संकल्पना मोडीत काढून तिच्या विविध उपप्रकारांना आपल्या विचारव्यूहात स्थान देत कवितेची समग्रतालक्ष्यी मांडणी केली. आत्मपरतेबरोबर अनात्मपरता हाही कवितेचा गुण असू शकतो, हे पाटणकर यांना जाणवले. त्यातून कवितेतील आत्मपरता आणि अनात्मपरता या भेदाला अग्रक्रम देत पाटणकर यांनी कविता या साहित्यप्रकाराची एक नवी व्यवस्था लावण्याचा प्रयत्न केला आहे. कवितेच्या लयबद्धता, सांगीतिकता, अनेकार्थक्षमता, प्रयोगशीलता, वैचारिकता अशा वेगवेगळ्या पैलूंचा विचार त्यांनी या नव्या व्यवस्थेअंतर्गत केला आहे. ही व्यवस्था लावताना त्यांनी कवितेसंबंधी मराठीत झालेला विचार, संस्कृत साहित्यशास्त्र, पाश्चात्य साहित्यशास्त्र यांचा यथायोग्य आधार घेतला आहे.